(यशवंत हरणे, धुळे)
आज २० जून हा वर्ल्ड रेफ्युजी म्हणजेच जागतिक निर्वासित दिन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हा दिवस पाळला जातो. यानिमित्ताने जगभरातील निर्वासितांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा.
जगातील बहुसंख्या देश कमी अधिक प्रमाणात निर्वासितांच्या या प्रश्नाला तोंड देत आहे. सीरिया मधून प्राणांतिक भयाने होणारे स्थलांतर आणि त्यातून घडलेल्या अपघातामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या निर्वासितांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा वेधले गेले. सीरियातल्या एका चिमुरड्याचा समुद्र किनाऱ्यावरचा हा फोटो मध्यंतरी जगभर व्हायरल झाल्याचे आपण पाहीले. हा फोटो पाहून सर्वसामान्य माणसाचे हृदय देखील पिळवटून निघाले. पण याच फोटोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सीरियातील निर्वासितांचा प्रश्न जगासमोर आला. सीरियातील परिस्थिती बिघडल्याने असुरक्षित वाटल्याने तेथील निर्वासितांचे हे लोंढे युरोपीय देशांमध्ये आश्रयाला निघाले. पण या देशांमध्ये आश्रयास गेल्यानंतर देखील निर्वासितांच्या या प्रश्नामुळे आश्रयदात्या देशांमधील परिस्थिती काही काळ संघर्षाची झाली. त्याला या देशातील सुरक्षिततेचा आणि देश प्रेमाचा प्रश्न देखील यातून पुढे आला. आता या देशांमधील तणाव निवळला असला तरी जगभरातील निर्वासितांचा प्रश्न अजूनही कायम आहे.
सर्वसाधारणपणे धार्मिक, जातीय वंशवादाच्या छळाला कंटाळून हे लोक दुसऱ्या देशात स्थलांतर करत असतात. मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांनाच जगण्याचा हक्क आहे. पण वंशवाद आणि धार्मिक हिंसेतून कमकुवत वर्गाला भीतीपोटी इतरत्र स्थलांतर करावे लागणे,हे त्या देशातील राजकीय शक्तीचे अपयशच मानले गेले पाहिजे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहावा, त्याला कोणतेही वंशवाद किंवा जातीयवादाचा त्रास होऊ नये ,यासाठी त्या देशातील राज्यकर्त्यांची कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. पण सीरियाच्या बाबतीत असे घडले नसल्याने येथील मोठ्या वर्गाला आपला जीव वाचवण्यासाठी इतर देशात आश्रय घेणे आवश्यक बनले. यातून समुद्रात बोट बुडून झालेल्या अपघातानंतर निरागस बालकाचा मृत झालेला फोटो संपूर्ण जगात पोहोचला. यातून सीरियामधील भराव परिस्थितीची माहिती संपूर्ण जगाला मिळाली.
स्थलांतर हे जगाच्या सीरिया, म्यानमार, अफगणिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये हा प्रश्न खूपच ज्वलंत बनल्याचे बघायला मिळते. सीरियातून मुस्लिमांना तर म्यानमारमधून रोहिंग्यांना याच वंशवादातून निर्वासितांचं इतरत्र जिणे जगावे लागत आहे.
जगभरातील निर्वासितांची आकडेवारी प्रत्येक मिनिटाला 20 लोक निर्वासित बनतात बहुतांश निर्वासित हे सीरिया, अफगणिस्तान, द. सुदान या देशातून येतात निर्वासितांपैकी 51टक्के लोक 18 वर्षाखालील शालेय मुले जगभरातील निर्वासितांची लोकसंख्या अंदाजे 6.5 कोटी तर देशांतर्गंत विस्थापितांची लोकसंख्या 40.3 दशलक्ष निर्वासितांचा लोंढा आल्यानंतर संबंधीत देशांमध्ये बाहेरचे आणि स्थानिक असा संघर्ष उद्भवतो.
भारतामध्येही मध्यंतरी रोहिंगे आणि तिबेटियन आणि बांग्लादेशी निर्वासितांचा प्रश्न अशाच गंभीर वळणावर येऊन पोहोचला. या निर्वासितांच्या लोंढ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था आणि सुरक्षितता यावर कमालीचा ताण येतो. भारतात तर स्थलांतरित होऊन आलेल्या जमातीमधील काही लोकांचा या देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवण्यासाठी उपयोग केला जात असल्याचे आरोप अनेक वेळेस झाले. त्यामुळे या देशात आलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी संदर्भात भारतात देखील संघर्षाची भूमिका तयार झाली. विशेषता बऱ्याच अन्य देशांनी या रोहिंग्यांच्या निर्वासितांचे लोंढे आपल्या देशात नको असल्याची भूमिका घेतल्याची माहिती मध्यंतरीच्या काळात पुढे आली. भारतात रोहिंग्यांच्या संदर्भात सरकारने देखील देशाची सुरक्षितता आणि काळजी या दृष्टीने पावले उचलली. जीवन जगण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे. त्यामुळे माणुसकी म्हणून भारताने देखील या निर्वासितांसाठी कॅम्पची व्यवस्था केली. या शिबिरांमधील निर्वासितांसाठी भारताने कोट्यावधी रुपयांच्या साधन सुविधा उपलब्ध देखील करून दिल्या. पण आश्रयाला येणारा लोंढा हा दिवसागणिक वाढत असल्याने या कॅम्प मधील साधन सुविधेवर देखील मोठा ताण पडतो. त्यातच कॅम्प मधील निर्वासित देशभरामध्ये कमी अधिक प्रमाणात पसरल्याच्या घटना निदर्शनास आल्यामुळे देखील सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या समोर मोठा पेच तयार झाला. ही एका दृष्टीने चिंतेचीच बाब आहे.
कारण निर्वासितांच्या आडून अनेकदा घुसखोरी झाल्याचीही उदाहरण समोर आली आहेत. पण म्हणून काही सर्वच निर्वासितांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे व त्यांना माणुसकी हीन वागणूक देणे योग्य होणार नाही.एकूणच निर्वासितांच्या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टीने पाहायचे झाले तरी निर्वासितांच्या लोंढ्यामुळे अनेकदा आश्रयाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडतो. बेरोजगारीचीही समस्या उद्धवते. म्हणूनच निर्वासिताचं स्थलांतरच होणार नाही. अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी स्थलांतर होत असलेल्या देशांनी त्यांच्या देशातच सुरक्षिततेचे वातावरण तयार केले पाहिजे. वंशवाद आणि जातीयवादाच्या मुद्द्यावरून समूहाला त्रास देणे कसे थांबवता येईल, यासाठी प्रसंगी कठोर उपाय योजना केल्या पाहिजे. कोणतीही वाईट घटना घडल्यानंतर त्याचा अतिरेक झाल्यानंतर दुसरा वर्ग प्रत्युत्तर देण्यासाठी उभा राहतो .यातून संघर्ष निर्माण झाल्याचे आतापर्यंत बहुसंख्य घटनांमधून दिसून येते. अशा घटनाच होणार नाही याची काळजी संबंधित देशांनी देखील घेतली पाहिजे. त्यामुळे एखादी समस्या सुरू झाल्यानंतर त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे ठरते. त्यामुळे स्थलांतराचा हा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी संबंधित देशांवर देखील कठोर स्वरूपाचे निर्बंध घातले जावेत असा विचार देखील पुढे येतो आहे.