हिंदी आणि मराठी चित्रपटातील सोज्वळ आई सुलोचना दीदी
(यशवंत हरणे, धुळे)
हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका पडद्यावर जिवंत करणाऱ्या सुलोचनाताई लाटकर यांचा आज जन्मदिवस. दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाताईंची प्रतिमा या देशातल्या लाखो चित्रपट रसिकांच्या मनात आई अशीच आहे.
अभिनेत्री सुलोचनाताई यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. चित्रपट सृष्टीत सुलोचना दीदी नावाने त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचे वडील हे पोलीस दलात नोकरीस होते. वडिलांनी दीदी यांच्या लहानपणापासूनच आवडीनिवडी जोपासल्या. दिदी यांना मास्टर विनायक यांनी ज्युनियर कलाकार म्हणून काम करण्याची संधी दिली. सुरुवातीच्या काळात दीदी यांच्या भाषेत ग्रामीण भाषेतील शब्द होते. मात्र दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीदी यांनी संस्कृत श्लोकांचे पठण तसेच हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले. यानंतर त्यांना 1944 च्या कालखंडात सासुरवास या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. भालजी पेंढारकर यांच्या मीठ भाकर ,जीवाचा सखा या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका ही विशेष लक्ष वेधून गेली. तर वहिनीच्या बांगड्या या चित्रपटांमध्ये दीदी यांनी केलेला अभिनय हा त्यांना सोज्वळ मूर्ती म्हणून ओळख देऊन गेली. याच कालावधीमध्ये साधी माणसं, बाळा जो जो रे, दूध भात , मराठा तितुका मेळवावा अशा अनेक मराठी चित्रपटातील भूमिका स्मरणात राहतील अशाच आहे. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटात त्यांनी जिजाऊंची भूमिका साकारली. तर महाराणी येसूबाईची भूमिका देखील त्यांनी अन्य चित्रपटात केली. या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्या. सुलोचना दिदी यांनी मराठी चित्रपटातून नायिकेची भूमिका केली. बहुसंख्य चित्रपटातून त्यांनी आई, सासू ,वहिनी, बहीण अशा विविधरंगी भूमिका साकारल्या.
मराठी आणि हिंदी चित्रपटात घरंदाज आई म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचे त्यांना मोठे मार्गदर्शन लाभले. सुलोचना ताई यांनी 1943 मध्ये पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत हिंदी चित्रपटात अभिनय केला. हिंदी चित्रपटांमध्ये 1950 ते 1960 या दरम्यान त्यांनी आईची भूमिका प्रभावीपणे वठवली .त्यांनी 250 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप पाडली.
त्यांच्या चित्रपट योगदानाबद्दल 2003 मध्ये मराठी सिनेमाचे संस्थापक म्हणून ओळख असणारे बाबुराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त दिदी यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 2009 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. सुलोचना दीदी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार 1962- 63, विशेष अभिनेत्री पुरस्कार 1967- 68, व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 1997 , कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या गोदावरी पुरस्कार 2018, सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार 2002 ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार 2003, फिल्म फेअर जीवनगौरव पुरस्कार 2004, मध्ये मिळाला. तर राष्ट्रीय पुरस्कार रौप्य पदक 1955, 1956, 1959 मध्ये मिळाले. तर विशेष गुणवत्ता पुरस्कार 1965, राष्ट्रीय पुरस्कार रौप्य पदक १९७० व पद्मश्री 1999 मध्ये मिळाला
सुलोचना दीदी यांनी मराठा तीतुका मेळावा, मोलकरीण, बाळा जो जो रे ,सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा असंख्य मराठी चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटातील त्यांनी केलेला अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात त्यांचे आजही आदराचे स्थान आहे. दीदी यांनी मराठी सोबतच आये दिन बहार के ,कटी पतंग, चिराग, संबंध अशा हिंदी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला. विशेषता कपूर घराण्यातील तीन पिढ्यांसोबत त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. पृथ्वीराज कपूर यांच्या समवेत अभिनयाची त्यांनी सुरुवात केली असली तरीही त्यानंतर राज कपूर ,शम्मी कपूर, शशि कपूर या दुसऱ्या पिढीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. तर रणधीर कपूर, ऋषी कपूर ,नीतू सिंग, बबीता यांच्यासोबत देखील त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ या चित्रपटांमधून त्यांनी केलेला अभिनय तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सुलोचना दीदींनी 1957 मध्ये अब दिल्ली दूर नही, 1968 मध्ये आदमी, 1970 मध्ये कटी पतंग, 1986 मध्ये काला धंदा गोरे लोग, १९७० मध्ये जॉनी मेरा नाम, 1963 मध्ये बंदिनी, 1970 मध्ये मै सुंदर हु, 1968 मध्ये सरस्वतीचंद्र या हिंदी चित्रपटात तर 1959 मध्ये सांगते ऐका ,1964 मध्ये मराठा तितका मिळवावा अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केले. 1961 मध्ये संपूर्ण रामायण या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेली कैकयीची भूमिका देखील चांगलीच गाजली होती. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये यशस्वीपणे काम करत असताना त्यांनी मराठी चित्रपटाची आपले नाते कधीही तुटू दिले नाही. प्रत्येक वर्षी एक तरी मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली .यासाठी मोबदला कमी मिळाला तरीही त्यांनी त्याची पर्वा कधीही केली नाही.
आपल्या सोज्वळ अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी यांनी 4 जून 2023 रोजी 94 वर्षी अखेरचा श्वास घेतला.