“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”
(यशवंत हरणे, धुळे)
” मै शकील दिल का हूँ तर्जुमान, कई मुहोब्बतका हूँ राजदान, मुझे फक्र है मेरी शायरी मेरी जिंदगी से जुदा नही” …. असे नेहमी म्हणणारे हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक कर्णमधूर आणि अर्थपूर्ण गीतांच्या माध्यमातून प्रसिद्ध असणारे उर्दू शायर तथा कवी शकील बदायुनी यांचा आज जन्मदिवस. चित्रपटसृष्टीमध्ये गीतकार आणि संगीतकार यांच्या जोड्या कमालीच्या प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच संगीतकार नौशाद आणि शकील बदायुनी या जोडीने चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहतील, अशी अनेक गीते दिली आहेत. जी आजही सिने रसिकांच्या मनावर राज्य करतात. विशेषता मुघले आझमच्या जब प्यार किया तो डरना क्या हे गीत तर अजरामर झाले आहे.
उत्तर प्रदेशातील बदायुन प्रांतात जन्म झालेले कवी शकील बदायुनी यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. याच माध्यमातून त्यांनी अनेक दर्जेदार गझल लिहिल्या. आणि या सर्व गझल त्यांनी मुशायऱ्यांमधून रसिकांपर्यंत पोहोचवल्या. चित्रपट दृष्टीत येण्याच्या आधी ते भारतभरामध्ये प्रसिद्ध कवी शायर म्हणून ओळखले जात होते .त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली होती. त्यांच्या परिवारामध्ये काव्य आणि चित्रपटसृष्टी याचा कोणताही पारंपारिक वारसा नसताना शकील बदायिनी यांचे उर्दू भाषेवरील प्रभुत्व आणि प्रेम यातूनच सिने रसिकांच्या काव्य आणि हृदयाला भिडणाऱ्या रचना त्यांनी तयार केल्या. ज्या आजही चित्रपट रसिकांना स्मरणात आहेत. त्यांची उर्दू भाषे संदर्भात असणारी आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना उर्दू आणि अरेबिक हिंदी तसेच पारशी भाषेच्या शिक्षणासाठी या क्षेत्रातील तज्ञांची मदत शकील यांना मिळवून दिली. याच कालावधीत 1936 मध्ये त्यांनी अलीगड विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली.
बी ए ची पदवी घेऊन ते बदायुनीहून दिल्लीत गेल्यावर तिथे पोटासाठी पुरवठा अधिकारी म्हणून किरकोळ स्वरुपाचे काम केले. यावेळी त्यांनी तेथील मुशायऱ्यांमध्ये देखील सहभाग घेऊन आपल्या रचना सादर केल्या. आपल्या शायरीच्या माध्यमातून त्यांनी दिल्ली आणि परिसरात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर ते मुंबई येथे आले . मुंबई येथील मुशायऱ्यांमध्ये देखील त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्या काळात मुशायऱ्यांमध्ये दिग्गज शायर असताना देखील आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. मात्र शकील यांनी हे आव्हान आपल्या कलेच्या जोरावर आणि ज्ञानाच्या आधारावर लिलया पेलले. शकील बदायुनी यांचा दर्द हा पहिला चित्रपट. या चित्रपटासाठी त्यांनी “अफसाना लिख रही हू ,दिले बेकरार का, आखो मे रंग बरसे तेरे इंतजार का ” हे गीत लिहिले. त्यावेळी हे गीत उमादेवी म्हणजेच हास्य अभिनेत्री टूनटून यांच्या आवाजात शब्दबद्ध करण्यात आले .हे गाणे देखील आजही अजरामर असेच आहे. या गाण्याने शकील यांचा डंका चित्रपटसृष्टीत वाजू लागला.
शकील यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीत लिहिले. ही गीते ऐकताना सिनेरसिक आजही डोलताना दिसतात. शकील यांचे गीत असले म्हणजे नौशाद यांचे संगीत आहेच, असे गृहीतक निश्चित झाले. या जोडीने त्यांच्या कलेच्या आधारावर अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी केले. या जोडीने दर्द, दिदार, शबाब, दुलारी ,अमर असे अनेक यशस्वी चित्रपट दिले .या काळात 1952 मध्ये दिग्दर्शक दिवंगत विजय भट यांच्या बैजू बावरा चित्रपटासाठी ते गीतकाराच्या शोधात होते. या चित्रपटासाठी कवी प्रदीप यांना घेण्याचे जवळपास निश्चित झाले होते. चित्रपटाच्या कथानकात एका हिंदी कवीच्या रचना लिहिण्यासाठी कवी प्रदीप यांना संधी देण्याच्या विचारात दिग्दर्शक होते .मात्र संगीतकार नौशाद यांनी केलेल्या आग्रहामुळे दिग्दर्शकाने बैजू बावराचे गीत लेखन करण्याची जबाबदारी शकील बदयुनी यांना दिली. चित्रपटामध्ये हिरो असणाऱ्या भारत भूषण यांनी एका हिंदी कवीची भूमिका वठवली होती. त्यांच्यासाठी याच धाटणीत गीत लिहिणे हे एका प्रकारचे आव्हान शकील यांनी स्वीकारले .आणि ते लिलया पेलेले सुद्धा. या चित्रपटातील “तू गंगा की मौज मै जमना की धारा ” हे गाणे तर त्यावेळी बिना का गित माला या सिरीज मध्ये टॉपचे ठरले. बैजू बावरा या चित्रपटासाठी एक विशेषता सांगता येईल. या चित्रपटातील सर्व गाणी ही हिंदू कवीच्या धाटणीतली होती. मात्र संगीतकार, गीतकार आणि गायक हे मुस्लिम असताना या चित्रपटातील गाणी कमालीची गाजली.
गीतकार शकील बदायुनी यांच्या कारकिर्दीत मुघले आझम या के आसिफ यांच्या चित्रपटाने चार चांद लावले .हा चित्रपट तसा ऐतिहासिक कथानका आधार घेऊन तयार करण्यात आला होता. मोगल सम्राट अकबर आणि त्यांचा मुलगा सलीम यांच्या मधले द्वंद्व या चित्रपटात दाखवले. सलीम आणि त्याची अनारकली समवेतची प्रेम कहाणी यावर गीत लिहिण्याचे आव्हान खरोखर त्यावेळी होते. पण या गीत लेखनातून चित्रपटामधला गाभा दाखवण्यात शकील यांना कमालीचे यश आले. विशेषता मुघल सम्राट अकबराच्या समोर आपल्या प्रेमाची वास्तवता सांगणारे गीत आजही चित्रपट रसिकांच्या जिभेवर खेळते.” जब प्यार किया तो डरना क्या ” या गीताच्या माध्यमातून तर मुगले आश्रम हा चित्रपट अजरामर झाला. याच चित्रपटात ” जिंदाबाद जिंदाबाद ए मोहब्बत जिंदाबाद ” या गाण्यामधून शक्तिशाली असणाऱ्या सम्राटाला आव्हान देण्याचे काम शकील यांनी शब्दबद्ध केले. या गीतामध्ये ” प्यार की दुश्मन होश मे आ, हो जायेगा बरबाद ” या शब्दातून तर चित्रपटातील शक्तिशाली सम्राटाला हलवण्याचे काम शकील यांनी केले. तर ” तेरी महफिल में किस्मत आजमा कर हम भी देखेंगे ” या गाण्यामधून एकाच युवराज वर आपले प्रेम व्यक्त करणाऱ्या दोन प्रेयसीच्या भावना दाखवण्यात शकील यांना कमालीचे यश आले.
संगीतकार रवी यांचा दो बदन, चौदहवीका चांद, घराना, गृहस्थी तर संगीतकार हेमंतकुमार बरोबर बिस साल बाद, बिन बादल बरसात, साहब बिबी और गुलाम तर सचिनदेव बर्मन यांच्याबरोबर कैसे कहू, बेनजिर. सी राम चंद्र यांच्याबरोबर जिंदगी और मौत, रोशन बरोबर बेदाग व नूरजहाँ, हे शकिल बदायुनीच्या गाण्यांनी गाजलेले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत .संगीतकार नौशाद, दिलीपकुमार, जॉनीवॉकर, संगीतकार रवी हे त्यांचे अत्यंत जीवलग मित्र होते ज्यांच्याबरोबर ते वेळ असेल तेंव्हा बॅडमिंटन वा पतंग उडवण्याचा शौक पूर्ण करत.
शकिल बदायुनी यांच्या गीतलेखनाला फिल्मफेअर सारख्या मात्तबर संस्थेने तिनदा लागोपाठ उत्कृष्ट गीतकार म्हणून गौरव केला आहे. १९६१ मध्ये आलेला चौदहवी का चांद या चित्रपटात गुरुदत्त यांच्यावर चित्रित झालेले तसेच मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ” चौदहवी का चांद हो या आफताब हो ” या गीताबददल ,तसेच १९६२ मध्ये गृहस्थी मधील ‘हुस्नवाले तेरा जबाब नही..’ , तर १९६३ मध्ये बीस साल बाद या चित्रपटातील ‘ कही दिप जले कही दिल..’ या गितासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून फिल्मफेअरने गौरवले आहे.
शकील बदायुनी यांनी चित्रपटसृष्टीसाठी अनेक कर्ण मधुर गीते दिले. त्यातील निवडक गीतांमध्ये सुहानी रात ढल चुकी ( दुलारी ),
मन तडपत हरी दर्शन को आज ( बैजू बावरा ), ओ दुनिया के रखवाले ( बैजू बावरा ), मधुबन मे राधिका नाचे रे ( कोहिनूर ), प्यार किया तो डरना क्या? ( मुघल-ए-आझम ),चौदहवी का चांद हो ( चौदविन का चांद ), ये जिंदगी के मेले ( मेला ), हुए हम जिंके लिए बरबाद ( दीदार ),
मान मेरा एहसान ( आन ),
मेरे मेहबूब तुझे मेरी ( मेरे मेहबूब ),एक शहेनशाह ने बनवा के हसीन ताजमहाल ( नेता ), कोई सागर दिल को ( दिल दिया दर्द लिया ),
बेकरार कर के हमे यु न जाईये ( बीस साल बाद ), लो आ गई उनकी याद ( दो बदन ),
ना जाओ सैयां ( साहिब बीबी और गुलाम ),
मेरी बात रही मेरे मन मे ( साहिब बीबी और गुलाम ), आज पुरानी राहों से ( आदमी ) अशा अनेक कर्ण मधुर गाण्यांचा उल्लेख करता येईल .या सर्व गीतांच्या माध्यमातून शकील बदायुनी हे चित्रपट रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत. 20 एप्रिल 1970 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.