शोलेमधील गब्बर डाकूच्या रूपाने
अजरामर झालेले अमजद खान
(यशवंत हरणे, धुळे)
“कितने आदमी थे ” “ये हात मुझे दे दे ठाकूर” या संवादाच्या माध्यमातून देशभरात गब्बर सिंग डाकूची भूमिका अजरामर करणाऱ्या अमजद खान यांचा आज स्मृती दिवस आहे. शोले हा चित्रपट 1975 मध्ये तयार झाला. पण आजही या चित्रपटातील गब्बर सिंग हा प्रत्येकाच्या स्मरणात आहे.
अमजद खान यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1940 मध्ये प्रसिद्ध अभिनेता जयंतच्या पश्तून कुटुंबात पेशावरमध्ये झाला होता. हिंदी चित्रपट सृष्टीत जयंत हे दिग्गज नाव होते. त्यांनी देखील चरित्र अभिनेता म्हणून आपल्या अभिनयाची छाप सिने रसिकांच्या मनावर सोडली. हिंदी चित्रपट सृष्टीत वीस वर्षाच्या कारकिर्दीत अमजद खान यांनी 130 पेक्षा जास्त चित्रपटात भूमिका केल्या. पण 1975 मध्ये सिप्पी याचा आलेला” शोले” हा चित्रपट आजही रसिकाच्या स्मरणात आहे. या चित्रपटात अमजद खान यांनी गब्बर डाकूची भूमिका वठवली .ग्वाल्हेरच्या परिसरात 1950 च्या सुमारास गब्बरसिंग गुजर या दस्युचा बोलबाला होता. त्याच पार्श्वभूमीवर शोले मधील गब्बर या पात्राचा जन्म झाला. सुरुवातीला या भूमिकेसाठी डॅनी यांना संधी मिळणे जवळपास निश्चित होते. मात्र फिरोज खान निर्मित “धर्मात्मा” चित्रपटाच्या अफगाणिस्तान येथे सुरू असलेल्या शूटिंगमध्ये डॅनी हे व्यस्त असल्यामुळे त्यांना शोले चित्रपट स्वीकारता आला नाही. त्यामुळे ओघाने ती भूमिका अमजद खान यांच्याकडे आली. ही भूमिका साकारण्याच्या पूर्वी अमजद खान यांनी चंबलच्या डाकूंवर लिहिलेल्या पुस्तकाचा अभ्यास देखील केला. त्यानंतर सलीम जावेद यांनी लिहिलेल्या या कथानकाला त्यांनी न्याय दिला. विशेषता अमजद खान यांच्या तोंडी असलेले संवाद त्यावेळी फारच गाजले. होळीच्या गीतानंतर “कहा है रे फौजी नंबर दो “तसेच बसंतीच्या भूमिकेतील हेमामालिनी यांना “देखो छमीया” तर ठाकूरच्या भूमिकेतील संजीव कुमार यांना “ये हात मुझे दे दे ठाकूर “असे म्हणणारा गब्बर हा त्याचा क्रूर स्वभाव दर्शवतो. शोले या चित्रपटाच्या माध्यमातून अमजद खान यांनी गब्बरची भूमिका अजरामर करण्यात यश मिळवले .यानंतर आलेल्या “मुकद्दर का सिकंदर” या चित्रपटात त्यांनी दिलावर गुंडाची भूमिका देखील अशाच पद्धतीने यशस्वीपणे केली. या चित्रपटात अभिनेत्री रेखा तसेच अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांचा त्रिकूट आजही सिने रसिकांच्या स्मरणात आहे. याच कालावधीमधील” गंगा की सौगंध” या चित्रपटात जनतेवर अन्याय करणारा ठाकूर त्यांनी उभे उभे साकारला. तर कालिया चित्रपटातला सेठ या भूमिकेला देखील अमजद खान यांनी न्याय दिला. बऱ्याच चित्रपटात त्यांनी विनोदी अभिनेत्याची भूमिका देखील पार पाडली. यात “लव्ह स्टोरी” या चित्रपटात अमजद खान यांनी स्वप्नाळू हवालदाराची भूमिका केली .अभिनेता कुमार गौरव आणि अभिनेत्री विजयता पंडित यांना अटक करणारा हवालदार अमजद खान यांनी पडद्यावर साकारला. या युगलला अटक करून नेत असताना त्यांनी दाखवलेल्या स्वप्नात रंगणारा पोलीस पाहून प्रेक्षकांना हसू आवरले गेले नाही. तर घरून प्रेम विवाहाला विरोध असताना या युगलांना मदत करणारा अमजद खान प्रेक्षकांची दाद घेऊन जातो. लावारिस चित्रपटातील अमजद खान यांची भूमिका देखील अशाच पद्धतीने गाजली. याराना चित्रपटातील त्यांचे ” बिशन चाचा कुछ गावो ” हे गाणे देखील बरेच गाजले. या चित्रपटात प्रामाणिक मित्राची भूमिका वठवण्यात अमजद खान यांना यश आले. या चित्रपटात “भोले ओ भोले “या गाण्याची रेकॉर्डिंग करून आपल्या मित्राला गायक बनवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारा मित्र साकारण्यात अमजद खान हे उजवे ठरले .तर सुहाग , राम बलराम, बरसात की एक रात ,पाताल भैरवी, हिम्मतवाला अशा अनेक चित्रपटांमधील अमजद खान यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहील अशीच आहे. वैयक्तिक जीवनात अमजद खान यांनी चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करणाऱ्या अनेकांना मदतीची भूमिका ठेवली. एका प्रतिक्रियेमध्ये त्यांनी जीवनात मित्र असले पाहिजे. मित्रापेक्षा कोणीही अनमोल नाही. असे मत मांडले .मात्र अशाच काही मित्रांपासून त्यांना विश्वासघात झाल्याचे शल्य देखील त्यांनी व्यक्त केले.
अमजद खान यांचे वडील जयंत हे कसलेले अभिनेते होते त्यांच्या समोरच आपला शोले हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी अमजद खान यांची इच्छा होती. शोले या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रत्येक डायलॉग साठी विशेष मेहनत घेतली होती. त्यामुळे अमजद यांना या चित्रपटापासून फार आशा होती. शोले हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला. तो ब्लॉकबस्टरवर कमालीचा यशस्वी ठरला. असे सांगितले जाते की, त्यावेळी हा चित्रपट पाच वर्ष एकाच सिनेमागृहात चालला. हा एक विशेष रेकॉर्ड होता. या चित्रपटांमधून अमजद यांना एक वेगळी ओळख मिळून ते यशाच्या शिखरावर पोहोचले. मात्र त्यापूर्वी दोन जून 1975 रोजी त्यांचे वडील म्हणजे अभिनेता जयंत यांचे मात्र निधन झाले होते. हे शल्य अमजद यांना नेहमी बोचत राहिले. अमजद यांचा शेवट मोठ्या त्रासात झाला. एका अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना व्हीलचेअर वर राहावे लागले. त्यामुळे त्यांचे वजन देखील वाढले त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.अशा या गुणी अभिनेत्याचा मुंबई येथे 27 जुलै 1992 रोजी मृत्यू झाला.