रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे
अफलातून दिग्दर्शक चेतन आनंद
(यशवंत हरणे,धुळे)
हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिभावान निर्माता दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून चेतन आनंद यांना ओळखले जाते. त्यांनी दिलेल्या दर्जेदार चित्रपट आणि त्यातील कर्ण मधुर गीतांची आजही श्रोत्यांना भुरळ पडते .अशा या गुणवान दिग्दर्शकाचा आज त्यांचा स्मृतिदिवस आहे.
चेतन आनंद यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तान मधील लाहोर येथे 3 जानेवारी 1921 मध्ये झाला. त्यांचे वडील पिशवीलाल आनंद हे प्रसिद्ध विधीज्ञ होते. चेतन यांनी भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण घेतले. हरिद्वार येथील गुरुकुल कांगडी विद्यालयात त्यांनी हिंदू शास्त्राचा अभ्यास केला. तर त्यानंतर लाहोर येथील शासकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी इंग्रजी भाषेची पदवी मिळवली. चित्रपटसृष्टीत येण्याच्या पूर्वी त्यांनी बीबीसी आणि देहरादून येथील शाळेत बराच काळ नोकरी केली. मुंबई येथे 1940 च्या सुमारास ते आले. इतिहासाचे प्राध्यापक असताना त्यांनी सम्राट अशोकावर एक पटकथा लिहिली होती. हीच पटकथा घेऊन ते दिग्दर्शक फणी मुजुमदार यांना भेटले .मात्र मुजुमदार यांनी त्यांना राजकुमार या चित्रपटाकरिता मुख्य कलाकाराच्या भूमिकेची संधी दिली . या कालावधीमध्ये चेतन आनंद हे इंडियन पीपल्स थिएटर म्हणजेच इप्टा या नाट्य संस्थेची जोडले गेले. या संस्थेच्या माध्यमातून ख्वाजा अहमद अब्बास ,बलराज सहानी, विमल रॉय यांच्यासारखे अनेक अभिनेते व दिग्दर्शक सिनेसृष्टीला मिळाले आहेत. ही सर्व कलाकार मंडळी डाव्या विचारसरणीची होती .चेतन आनंद हे त्यांच्याच संपर्कात आले. चेतन आनंद यांनी 1946 मध्ये वर्ग संघर्ष आणि गुलामगिरी सारख्या विषयावर प्रकाश टाकणारा नीचा नगर हा चित्रपट बनवला. एका बांधकाम व्यावसायिकांनी गरीब वस्ती ताब्यात घेण्यासाठी केलेले सर्व कारनामे आणि या सर्व कारनाम्यांना उत्तर देण्यासाठी नायिकाच्या मदतीने गरीब जनतेने केलेला संघर्ष या चित्रपटांमधून रेखाटला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील प्रभावी संवाद हे प्रेक्षकांच्या आज देखील स्मरणात आहेत.चित्रपटासंदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचे निर्माते रशीद अन्वर फाळणीनंतर या चित्रपटाची मूळ प्रत आपल्यासोबत घेऊन गेले. बऱ्याच वर्षानंतर प्रकाशचित्रणकार सुब्रतो मित्रा यांना कोलकात्याच्या एका रद्दीच्या दुकानात खराब होण्याच्या मार्गावर असलेली या चित्रपटाची रीळ सापडली. ही रीळ पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हकडे सुपूर्द करण्यात आली. या चित्रपटाला फ्रान्सच्या आतंरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात ‘ग्रॅन्ड प्रीक्स’ हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारा भारताचा हा पहिला व एकमेव चित्रपट आहे. चेतन आनंद यांनी 1950 मध्ये त्यांचे भाऊ देव आनंद आणि विजय आनंद या दोघांच्या समवेत नवकेतन संस्थेची स्थापना केली. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले. यात बाजी, टॅक्सी ड्रायव्हर ,फंटूस, कालापाणी, कालाबाजार यासारखे चित्रपटांची नावे घेता येतील. 1954 मध्ये त्यांनी तयार केलेल्या टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटांमध्ये क्लब मधील जीवन तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांच्या विळख्यात अडकलेली नायीका यावर प्रकाश झोत टाकला. या चित्रपटातील तलत महेमुद यांच्या आवाजातील गाणी बरीच गाजली. “जाये तो जाये कहा, समजेंगा कौन यहा” तसेच ” दिल जले तो जले” , तर बाजी चित्रपटात गीता बाली यांच्या आवाजात
” तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले ,अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले ” हे गाणे आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. या गाण्यात अभिनेता देव आनंद आणि गीता बाली यांनी अफलातून अभिनय केला आहे. कालापाणी या चित्रपटात मधुबाला आणि देव आनंद यांच्यावर चित्रित केलेले ” अच्छा जी मै हारी, चलो मान जावो ना ” तसेच अभिनेत्री नलिनी जयंत यांच्यावर चित्रीत केलेले ” नजर लागी राजा तोरे बंगले पर ” तर मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ” हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये ” या गाण्यांनी तर धमालच केली होती. कालाबाजार या चित्रपटात देखील कर्ण मधुर गाणी दिली. “अपनी तो हर आह एक तुफान है, क्या करे वो जानकर अंजान है”. “ना मै तन चाहू ,ना है रतन चाहू ‘हे भजन, ” सांझ ढली, दिल की लगी ,थक चली पुकार के, आजा ,आजा ” हे मन्ना डे यांच्या आवाजातील गाणे, मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ” खोया खोया चांद, खुला आसमान ” या गाण्यांनी चित्रपट रसिकांना भुरळ घातली. फंटूश या चित्रपटात किशोर कुमार यांच्या आवाजातील ” दुखी मन मेरे सुन मेरा कहना ” हे गीत आजही चित्रपट रसिकांच्या ओठावर आहे. 1962 मध्ये त्यांनी तयार केलेला हकीकत हा चित्रपट तर कुणीही विसरू शकत नाही असाच आहे. या चित्रपटात भारत चीन युद्धाच्या कथानकावर आधारलेला होता. या चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ” कर चले हम फिदा जानो तन साथियो ” हे गाणे आज देखील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहत नाही. तर सैनिकांच्या मनात असलेल्या भावना देखील त्यांनी मै ये सोचकर उसके रर से उठा था ” या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाला त्यावर्षीचा उत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले .नवकेतन फिल्मच्या माध्यमातून तयार केलेले हे सर्व दर्जेदार चित्रपट आहेत. हिर-रांझा या चित्रपटात त्यांनी नवीन प्रयोग केला. या चित्रपटांमधील सर्व संवाद त्यांनी काव्य पद्धतीने तयार केले .या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर मोठी धमाल केली. या चित्रपटातील गाणी ” ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही” ” मिलो ना तुम तो हम घबराये, मिलो तो आप चुराये ” यांनी तर प्रेक्षकाचे मन जिंकले. राजेश खन्ना यांच्या समवेत त्यांनी 1981 मध्ये कुदरत हा चित्रपट केला. या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी झाला. अशा या गुणवान दिग्दर्शकाने 6 जुलै 1997 मध्ये या इहलोकाचा निरोप घेतला .मात्र त्यांनी दिलेल्या रचना या नेहमी चित्रपट रसिकांना त्यांची आठवण करून देत राहतील.