पुतळ्याचे सदोष काम
करणारे झारीतील शुक्राचार्य कोण
(यशवंत हरणे, धुळे)
अखिल भारतीयांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. या घटनेमुळे शिवप्रेमी जनतेमधून संताप व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. या घटनेत राजकारण करू नये, अशी नेहमीची अपेक्षा सत्ताधारी पक्षांनी व्यक्त केली आहे. पण निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या झारीतील शुक्राचार्य असणाऱ्या यंत्रणेचे काय करणार, याविषयी मात्र कोणीही बोलत नाही. प्रत्येक घटनेमध्ये दुसऱ्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना आता कुठेतरी आपली जबाबदारी देखील स्वीकारावी लागणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुमारे 400 वर्षांपूर्वी स्वराज्याची स्थापना करून भारताला स्वाभिमानाने कसे जगावे, याचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांनी उभे केलेले गडकोट आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात. महाराजांची दूरदृष्टी या किल्ल्याच्या स्थापत्य कलेमधून दिसून येते. विशेषता महाराजांनी उभारलेले सागरी किल्ल्याची तटबंदी आजही समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटांचा सामना करीत सुस्थितीत आहे. महाराजांनी त्यावेळी बांधलेल्या किल्ल्यांची स्थिती आज पाहता त्यांचे तंत्रज्ञान आणि बुद्धी चातुर्य बांधकाम कलेत देखील दिसून येते. छत्रपतींनी रायगड किल्ल्याचे निर्माण करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांचा सन्मान केला. त्या काळातही हिरोजी इंदुलकर यांनी आजच्या अत्याधुनिक ज्ञान असणाऱ्या इंजिनीयरला लाजवेल, अशा पद्धतीने दिमाखदार रायगड उभा केला. ज्याची भुरळ विदेशातील तज्ञांना देखील पडते. पण आज छत्रपतींच्या या महाराष्ट्रात त्यांचाच पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळावा, ही सरकारच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या डंका वाजवणाऱ्या पुतळा उभारणार्या यंत्रणेच्या दृष्टीने शरमेची बाब आहे. कोट्यावधी रुपये बांधून आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्या तज्ञ आणि संबंधित यंत्रणेकडून हा पुतळा उभारल्याचा दावा करण्यात आला. मात्र अवघ्या आठ महिन्यातच निसर्गाने हा दावा किती फोल आहे, हे दाखवून दिले. आता या घटनेचे विरोधी गटांनी राजकारण करीत टीकेची झोड उठवली आहे .विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या कामावर बोट ठेवून टीका करणे, ही बाब स्वाभाविकच आहे. पण विरोधकांना टीका करण्याची संधीच दिली मिळू नये, अशा पद्धतीने सत्ताधारी काम का करत नाही, हा सर्वसाधारण जनतेला पडलेला एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक दुर्दैवी घटना घडल्या. या घटनांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून केवळ राजकारण करू नये, एवढीच अपेक्षा व्यक्त केली जाते. पण आम्ही राजकारण करण्याची कुणाला वेळ येऊच देणार नाही ,अशा पद्धतीने दर्जेदार काम करू ,अशी शाश्वती मात्र एकदाही दिली गेली नाही. आता पुतळा कोसळल्याच्या घटनेत देखील अशाच पद्धतीने दावे प्रति दावे सुरू आहे .पण विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अजूनही सरकारकडून योग्य खुलासा केलेला नाही. संबंधित जिल्हा प्रशासनाने तर हा पुतळा ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत असताना पडल्याचा अजब दावाच केला आहे. वास्तविक पाहता समुद्राच्या किनारपट्टीवर अशा पद्धतीने वारे नेहमीच वाहत असतात. विशेषतः समुद्रातून आलेल्या वादळामुळे शंभर ते दीडशे किलोमीटर वेगाने वारे देखील या भागात वाहतात. ही बाब नौदलाचे तज्ञ किंवा पुतळा उभारणारे तज्ञ यांच्या लक्षातही राहू नये ही बाब मनाला पटणारी नाही.यापूर्वी महाराष्ट्रात गिरगाव चौपाटीवर शिल्पकार रघुनाथ फडके यांनी 1933 मध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवला आहे. त्याचप्रमाणे प्रतापगडावर पंडित नेहरू यांनी 1956 मध्ये बसवलेला शिव पुतळा हा देखील आजही सुस्थितीत आहे. या दोन्ही ठिकाणी नेहमी जोरदार वारे असतात. मात्र या वाऱ्यांना तोंड देत स्थापत्य कलेचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांनी त्यावेळी बसवलेला पुतळा आजही वादळी वाऱ्यांना तोंड देत उभे आहेत. पण राजकोट येथील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच पडतो, यावरून विरोधकांनी केलेले सर्व आरोप केवळ राजकीय हेतूने केलेले आहे ,असे म्हणणे देखील योग्य ठरणार नाही. यातील बऱ्याच दाव्यांमध्ये तथ्य असल्याचे आता प्राथमिक अवस्थेतून दिसून येते आहे .कोणतेही शासकीय काम सुरू करत असताना त्याची टेंडर प्रक्रिया महत्त्वाची ठरते. पुतळा बांधकाम प्रकरणात आता ही प्रक्रिया झाली आहे किंवा नाही, हे तपासून पाहिले पाहिजे. टेंडर प्रक्रियेनंतर नेमक्या किती निविदा आल्या, आणि या निविदा दाखल करणारे नेमके कोण आहे. ही बाब आता जनतेसमोर आली पाहिजे. शासकीय कामांमध्ये केवळ आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी बोगस निविदा दाखल करून लुटूपुटुची स्पर्धा दाखवल्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळेस महाराष्ट्रात घडल्या आहेत. तसा प्रकार या पुतळा प्रकरणात झाला आहे का, हे आता सरकार पक्षाला तपासून पहावे लागेल. एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर चौकशी समिती स्थापन करणे आवश्यकच असते. पुतळा प्रकरणाची देखील समितीकडून आता चौकशी यथायोग्य होतच राहील. पण या चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करून पारदर्शक कामाची प्रचिती सरकारकडून मिळावी, अशी शिवप्रेमींकडून रास्त अपेक्षा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा घाईघाईत बसवू नये ,असे दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी महाराज यांनीच सांगितल्याचे पत्र जनतेसमोर आले आहे. पण या सूचनेकडे सरकारने दुर्लक्ष का केले असावे, याचा खुलासा मात्र अजूनही झालेला नाही. समुद्राच्या खारट वाऱ्यांमुळे पुतळ्याचे काही भाग गंजले होते. त्यामुळे देखील पुतळ्याचे नुकसान झाल्याची माहिती पुढे येते आहे. पण हे माहीत असूनही त्यावर प्रभावी कार्यवाही का झाली नाही, यावर आता कोणीच बोलताना दिसत नाही. केवळ पुतळ्याच्या स्थितीची माहिती देणारे पत्र आम्ही पाठवले होते. त्यांनीच दखल घेतली नाही, असे सांगून यंत्रणेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. राजकोट चा पुतळा उभारणाऱ्या शिल्पकाराने एका दैनिकाला दिलेली त्यावेळीची मुलाखतीचा हवाला सोशल मीडियावरून देण्यात आला आहे. यात पुतळा उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार असताना आम्ही तो काही महिन्यात उभा केला, असे शिल्पकाराकडून सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब खरी असेल तर हा पुतळा काम चलाऊ पद्धतीने उभा करण्यात आला, या विरोधकांच्या दाव्यामध्ये तथ्य नाही, असे कोण सांगू शकेल.
काही वास्तुशिल्पकारांकडून या घटनेविषयी भाष्य करण्यात आले आहे. यात पुतळ्याच्या उंचीनुसार चबुतरा असावा, त्याचप्रमाणे पुतळ्याचे पाय मजबूत कसे असावे ,याविषयीची माहिती देण्यात आली आहे .असे सांगत असतानाच पुतळा पडल्याच्या घटनेचे सर्व खापर वास्तु शिल्पकारावर फोडणे योग्य होणार नाही, असे देखील मत व्यक्त करण्यात आले आहे. यात बऱ्याच अंशी तथ्य देखील आहे. वास्तू शिल्पकाराने पुतळा उभा करीत असताना त्यावर तज्ञ असणाऱ्या व्यक्तीचे किंवा यंत्रणेचे लक्ष असणे आवश्यक आहे. असे लक्ष का ठेवले गेले नाही, हा खरा वादाचा मुद्दा आहे. हा पुतळा नौदलाने उभारला असून तो बांधकाम विभागाने उभारला नाही, असे सांगत असताना एक प्रकारे जबाबदारी झटकण्याचेच काम होत असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमींमधून व्यक्त होते आहे.पुतळ्याच्या या घटनेत आता सत्तेत असणाऱ्या काही नेत्यांकडून याच ठिकाणी शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्याचे अजब दावे होत आहे. अवघा अठ्ठावीस फुटाचा पुतळा या ठिकाणी यंत्रणे कडून सुरक्षितपणे उभा राहत नसेल, तर शंभर फुटी पुतळ्याचे काय होईल, याची कल्पना देखील करवत नाही. राजकोटचा पुतळा नौदलाने उभा केला ही बाब सत्य आहे. नौदलाने यासंदर्भात खेद देखील व्यक्त केला आहे. पण देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौदलाकडे अनेक अत्याधुनिक साधनसामुग्री आहे. या साधनसामुग्रीची काळजी घेण्यासाठी तज्ञ व्यक्तींची फौज त्यांच्याकडे आहे. पण पुतळा उभा राहत असताना यापैकी एका देखील तज्ञाला या कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी देण्यात आली नाही, ही बाब आक्षेपार्ह वाटते. त्यामुळे केवळ खेद व्यक्त करून चालणार नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणारी नौदल यंत्रणा त्यांचाच पुतळा सुरक्षित ठेवू शकली नाही, ही जबाबदारी त्यांना जाहीरपणे स्वीकारत असतांना पुतळ्याच्या कामांमध्ये इतर यंत्रणेचा हस्तक्षेप होता किंवा नाही, ही बाब देखील त्यांना स्पष्ट करावी लागणार आहे .अन्यथा भारताच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या नौदल यंत्रणेवर बी जबाबदार असल्याच्या बदनामीचा डाग लागल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती देखील शिवप्रेमींकडून व्यक्त केली जाते आहे.
विशेषता विरोधकांकडून पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा उघड आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारा झारीतील शुक्राचार्य कोण आहे, ही बाब सरकारमधील नेत्यांना आणि नौदलातील अधिकाऱ्यांना शोधून काढावीच लागेल. अन्यथा भ्रष्टाचाराची ही कीड देशाला भविष्यात घातक ठरणार नाही, असे कोणीही खात्रीपूर्वक आज सांगू शकणार नाही.
या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण या दोघांची सखोल चौकशी करून त्यांच्या मागे आणखी लोक आहेत का?, ही बाब जनतेसमोर येईल की नाही, याबाबत शंका व्यक्त होते आहे. एका शिल्पकाराने तर त्याने उभारलेल्या दोन पुतळ्यात कशा पद्धतीने सरकारी यंत्रणेकडून त्रास देण्याचे प्रयत्न झाले, हे स्पष्टपणे सांगितले आहे. मालवणच्या पुतळ्यात असा प्रकार झाला आहे का, ही बाब देखील तपासून पाहण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केवळ राजकारण करण्याऐवजी किमान त्यांच्या महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांचे आणि महाराजांच्या रयतेचे रक्षण यानंतर आम्ही प्रामाणिकपणे करू, तसेच यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही, अशी प्रामाणिक कबुली देऊन भविष्यात काम करणे हेच खऱ्या अर्थाने या घटनेचे प्रायश्चित्त असू शकते. हे प्रायश्चित्त समंजस असणारे नेते आणि यंत्रणा करेल एवढीच शिवप्रेमींची अपेक्षा आहे.