जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा
देणारा क्रांती दिनाचा संघर्ष
( यशवंत हरणे, धुळे)
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऑगस्ट 1942 मध्ये झालेल्या क्रांतीचे फार मोठे महत्त्व आहे. मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा नारा दिला. याच अधिवेशनांमधून इंग्रजांना भारत छोडोचा इशारा देखील देण्यात आला. काँग्रेसच्या अधिवेशनांमधून सुरू झालेले हे आंदोलन देशभरामध्ये पसरले. या आंदोलनात मवाळ आणि जहाल या दोन्ही गटात मोडणार्या क्रांतिकारकांनी आपले योगदान आणि बलिदान दिले. ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झालेल्या या क्रांतिकारी आंदोलनामुळेच 9 ऑगस्ट हा दिवस या क्रांती दिन म्हणून ओळखला जातो.
भारतातील ब्रिटिश राज्य सत्तेने दुसर्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भारतीय नेत्यांनी ब्रिटिशांवर विश्वास ठेवून त्यांना दुसर्या महायुद्धामध्ये मदतीची भूमिका घेतली. पण इंग्रजी राजकारण हे धूर्त प्रवृत्तीने तयार झालेले असल्यामुळे त्यांनी या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. इंग्रजी राज्य सत्तेच्या अशा धूर्त वागण्यामुळे भारतामध्ये त्यांच्या विरोधात मोठा असंतोष तयार झाला. त्यातच क्रांतिकारकांसंदर्भात इंग्रजांचे
धोरण अत्यंत क्रूर पद्धतीचे असल्यामुळे जनतेमध्ये हा देखील रोष होता. त्यातच मुंबई येथील गोवालिया टँक मैदानामध्ये 8 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे अधिवेशन भरले. या अधिवेशनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या भूमिकेकडे अवघ्या भारताचे लक्ष लागून होते. महात्मा गांधी हे या मैदानातून कोणते रणशिंग फुंकतात त्यावर भारताची भविष्यातील सर्व रणनीती अवलंबून होती. यावेळी महात्मा गांधी यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला करेंगे या मरेंगे हा मूलमंत्र दिला. तर इंग्रजांना भारत छोडो चा इशारा दिला. या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे पहिल्या फळीतील नेते हजर होते. त्यांनी देखील इंग्रजी राज्य सत्तेला हादरा देणारे भाषण केले .त्याचा परिणाम या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांवर झाला. या मैदानापासून सुरू झालेले आंदोलन संपूर्ण भारतभरामध्ये वनव्यासारखे पसरले. इंग्रजांनी या आंदोलनाचे स्वरूप पाहता महात्मा गांधीसह सर्वच नेत्यांची धरपकड करून त्यांना अटक केली. आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी नेताच नसेल तर आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, असा फुटकळ अंदाज बांधून इंग्रजांनी सर्वच बिनीच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. मात्र त्यावेळी अरुणा आसिफ अली यांनी या आंदोलनात मोलाचा सहभाग दिला. देशभरामध्ये सविनय कायदेभंग सुरू झाला. इंग्रजांच्या कोणत्याही शासकीय कामाला सहकार्य करणे बंद झाले. शासकीय कार्यालयांवर भारताचा तिरंगा झेंडा फडकवून भारत माता की जय आणि इन्कलाब जिंदाबाद चे नारे लावले जाऊ लागले. सुरुवातीला ब्रिटिशांनी लाठी आणि त्यानंतर गोळीबाराचा वापर करून पाहिला. मात्र भारत वर्षामधील कार्यकर्ते मागे हटण्यास तयारच नव्हते. भारत छोडो चा वनवा ब्रिटिशांना होरपळून टाकेल, असे चित्र तयार झाले. त्यामुळे ब्रिटिशांनी महात्मा गांधी सह सर्वच नेत्यांना दीर्घकाळासाठी तुरुंगात ठेवण्याची रणनीती आखली. पण ही रणनीती त्यांच्याच अंगलट येण्याची चित्र तयार झाले.
भारत छोडो आंदोलनाचा वनवा खानदेशात देखील पसरला. नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभात फेर्या, मशाल फेरी, तिरंगा फेरी काढून ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण तयार केले. ब्रिटिशांनी महात्मा गांधी सह नेत्यांना महिना उलटून गेल्यानंतरही सोडले नाही. त्यामुळे 9 सप्टेंबर 1942 रोजी नंदुरबार मध्ये एक प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीला सुरुवातीला ब्रिटिश सैनिकांनी अडवले. पण देश प्रेमाने प्रेरित झालेले विद्यार्थी आणि आंदोलक अहिंसेच्या मार्गाने भारत माता की जय च्या घोषणा देत पुढे सरकत होते. त्यामुळे सैनिकांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. या प्रभात फेरीमध्ये तिरंगा ध्वज हा शहीद शिरीष कुमार मेहता या अवघ्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हातात होता. त्याने इंग्रजी सैनिकांकडे पाहून भारत माता की जय च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ब्रिटिशांनी थेट गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार हे शहीद झाले. त्यांच्या समवेत
धनसुखलाल वाणी, घनश्याम दास, शशिधर केतकर आणि लालदास हेदेखील शहीद झाले. आजही नंदुरबार मधील हुतात्मा स्मारक हे या शहीद विद्यार्थ्यांची आठवण करून देतात.
शिंदखेडा तालुक्यातील साळवे नजीक प्रतिसरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने धुळ्याच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचा खजिना लुटला. या क्रांतिकारकांची ही नंतर धरपकड झाली. तर अमळनेर मध्ये देखील शासकीय पोस्ट ऑफिसवर तिरंगा फडकवून आंदोलन करण्यात आले. विशेषता पश्चिम महाराष्ट्रात प्रतिसरकारच्या माध्यमातून क्रांतीसिंह नाना पाटील यांनी इंग्रजी राज्य सत्तेला सळो की पळो करून सोडले. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा – अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले.
आठ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक म्हणजेच आजचे क्रांती मैदानापासून सुरू झालेल्या या आंदोलनाने भारतभरामध्ये अनोखे रूप धारण केले .त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश राज्य सत्तेला या जन आंदोलनाला थांबवणे शक्य नव्हते. परिणामी 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांना हा देश सोडावा लागला. पण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली ही क्रांती सर्व हुतात्मे, क्रांतिकारक आणि आंदोलकांच्या बलिदानाची आठवण करून देणारी आहे. त्यांच्या स्मरणार्थ 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाचे बलिदान करणार्या ज्ञात, अज्ञात अशा असंख्य आंदोलक आणि आपल्या प्राणाचे बलिदान देणार्या क्रांतिकारकांना दैनिक अजिंक्य योद्धा टीमचा मानाचा मुजरा.