बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष
( यशवंत हरणे, धुळे)
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार होऊन अपमान जनक पद्धतीने देशातून पळून जाण्याची वेळ येणे ही बाब राजकीय दृष्ट्या घातक आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या उठावामुळे देशात अस्थिरता झाल्याने ही वेळ आल्याचे वरकरणी दिसत असले तरी या विद्यार्थी आंदोलनाच्या पाठीशी लष्कर आणि कट्टरपंथी असल्याचे देखील नाकारता येत नाही. एखाद्या राज्यकर्त्याला अशा पद्धतीने देशातून घालवण्याचा कट्टर विचार पंथांचा प्रयत्न भारताच्या दृष्टीने देखील डोकेदुखी ठरणारा असाच आहे. मुळात बांगलादेशची निर्मितीमध्ये भारताचे फार मोठे योगदान आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. भारतामधून वेगळे होत असताना सुजलाम सुफलाम पाकिस्तानचे स्वप्न दाखवणाऱ्या कट्टरपंथीयांनी बांगलादेश वर केलेले अत्याचार सर्व जगाने पाहिले. त्यावेळीची परिस्थिती पाहता बेरोजगारी, गरिबी आणि वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त झाल्यामुळेच बांगलादेश मुक्ती संग्राम सारखे आंदोलन सुरू झाले. वंग बंधू म्हणून ओळख असणाऱ्या शेख मुजीबुर्रहेमान रहमान यांनी या जनतेच्या असंतोषाला मोकळी वाट करून दिली. पाकिस्तानने आपल्याच विचाराच्या असलेल्या भावंडांवर केलेल्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या भावनांना साद घालत वंगबंधू यांनी उभे केलेले आंदोलन हे स्वातंत्र्यसंग्राम म्हणूनच ओळखले जाते. या कालावधीमध्ये बांगलादेश मधून आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यामुळे भारतावर मोठा ताण पडला. मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी थेट लष्कराची मदत पुरवून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवुन दिले. पाकिस्तानच्या लष्कराला भारतीय सैन्याने धूळ चारली. यानंतर बांगलादेशमध्ये एका वेगळ्या राज्य सत्तेचा उदय झाला.शेख मुजीबुर्रहेमान हे एक प्रकारे बांगलादेशमध्ये राष्ट्रवादी नेते म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांचे पुतळे देखील उभे राहिले. गेल्या पाच टर्म पासून शेख हसीना यांना यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून त्यांना सत्तेवर बसवले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून कट्टरपंथीयांनी पुन्हा डोके वर काढले. बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतलेल्या परिवारातील संबंधितांना नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये 30 टक्के आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले. या विरोधात असंतोष वाढला. तेथील न्यायालयाने देखील हे आरक्षण 30 ऐवजी पाच टक्क्यांवर आणले. हा एक प्रकारचा कट्टर पंथीयांच्या विचाराचा विजय झाला .मात्र एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याचे निमित्त म्हणून विद्यार्थ्यांनी या आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शने करण्यास सुरुवात केली .हे आंदोलन थांबवण्यासाठी तेथील सरकारने बळाचा वापर देखील केला. मात्र त्याला फारसा उपयोग होऊ शकला नाही. यावरूनच या परिस्थितीला लष्कराने खतपाणी घातले असावे ,अशी शक्यता नाकारता येत नाही. तर शेख हसीना यांच्या सर्व समावेशक विचाराला कट्टरवादी विचारांनी पायउतार करण्याची ही संधीच शोधली. आंदोलकांनी राष्ट्रवादी नेते म्हणून ओळख असणाऱ्या वंग बंधू यांच्या पुतळ्यावर चढून त्यांच्या पुतळ्याच्या डोक्यावर घणाचे घाव घातले .यावरून त्यांची विकृत विचारधारा देखील समोर येते . त्यांच्या देशाची पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबर मतभेद असणे, ही बाब समजण्या योगी आहे .मात्र बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात तुरुंगवास आणि हाल अपेष्टा भोगणाऱ्या वंग बंधूंचेच विचार नाकारण्याचे काम करणे, हे एक प्रकारे कट्टर पंथीयांचे कारस्थान या आंदोलनातून एक प्रकारे पुढे आले आहे.
विशेषता शेख हसीना यांचे भारतीय सरकार बरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बांगलादेश स्वातंत्र्य करण्यासाठी भारताने घेतलेल्या भूमिकेची त्यांना जाणीव असून त्यामुळेच त्यांनी बांगलादेशचे राजकारण करत असताना अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. ही बाब देखील कट्टर पंथीयांना न रुचणारी होती, असे आता उघड बोलले जाते आहे. त्यात भरीस भर म्हणून माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या विचाराच्या पक्षावर शेख हसीना यांनी नियंत्रण ठेवले होते. त्या विचारांना देखील विद्यार्थी आंदोलनाचे आईते कोलीतच मिळाले. आता बांगलादेशमध्ये तयार झालेली परिस्थिती पाहता लष्कर प्रमुखांनीच शेख हसीना यांना अवघे 45 मिनिटे वेळ देऊन देश सोडून जाण्याची संधी दिली. यावरून या विध्वंसक या विध्वंसक आंदोलनाच्या पाठीशी लष्करच असल्याचा संशय काढणे चुकीचे होणार नाही. ही सर्व परिस्थिती पाहता भारताची आणखी एक सीमा असुरक्षित होण्याचे चिन्ह भविष्यात निर्माण होणार आहे. बांगलादेशमध्ये कट्टरपंथीय विचार आणि त्याला पोषक वातावरण करणारे लष्कर यांच्या हाती फार काळ सत्ता राहिल्यास त्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. यापूर्वीच म्यानमार मधून भारतामध्ये रोहिंग्यांचे होणारे स्थलांतर हा डोकेदुखीचा विषय असताना पुन्हा बांगलादेश म्हणून येणारे निर्वासितांची व्यवस्था करणे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सुरक्षेवर ताण येण्यासारखेच आहे. त्यातच भारताच्या सीमेवर असणाऱ्या देशांमध्ये नाक खूपसून चीन भारतावर कुरघोडी करण्याचा एकही प्रसंग सोडत नाही. बांगलादेशच्या परिस्थितीचा फायदा चीनने उठवल्यास ही भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फार मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे बांगलादेशच्या परिस्थितीवर भारताला पुन्हा एकदा निर्णायक भूमिका घ्यावी लागू शकते, असेच चित्र तयार झाले आहे. एकीकडे पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे दहशतवादी कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत .तर दुसऱ्या बाजूला तोळा मासा शक्ती असणाऱ्या नेपाळ चीनच्या मदतीने भारताला नकाशावर का होईना पण डोळे दाखवण्याचे प्रयत्न करण्याची संधी सोडत नाही. या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीवर भारताला लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न देखील करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांच्या माहितीच्या आधारावर शेख हसीना या भारतात आश्रयाला आल्याचे कळते आहे. त्यावर आता भारत सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.