अतिसार हे भारतातील बालमृत्यूचे मोठे संकट
(डॉ अभिनय दरवडे,धुळे)
एखादी घटना घडून गेल्यानंतर यंत्रणा कूस बदलतात. थोड्या प्रमाणात हालचाली करतात. की पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
टँकरच्या दूषित पाणी प्यायल्याने 25 मुलांना विषबाधा होऊन त्यांना अतिदक्षता विभागात भरती व्हावं लागतं. आमच्या चुकलेल्या जलनीतीचं हे फलित आहे.
त्यानिमित्ताने अतिसार म्हणजेच डायरिया बद्दल थोडे जाणून घेऊ या.
पावसाळा सुरू झाला की याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागतात.
अतिसार हे भारतातील बालमृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमधील सर्व मृत्यूपैकी 13 टक्के मृत्यू यामुळे होतात.
2019 मध्ये 3,70,000 मुलांच्या मृत्यूसाठी डायरिया( अतिसार) कारणीभूत होते.
सामान्य वाटणारा हा आजार लहान मुलांसाठी योग्य काळजी न घेतल्यास अधिक धोकादायक आहे.
भारतासारख्या विकसनशील देशात बालपणातील अतिसार हा आजार मोठ्या प्रमाणावर होत आहे.
शिवाय, हे कुपोषणाचे एक प्रमुख कारण आहे.
यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
जागतिक स्तरावर होणाऱ्या या आजारात 90 टक्के रुग्ण हे विकसनशील देशांमध्ये आहेत.
विकसनशील देशांमध्ये पाच वर्षाखालील मुलांमध्ये अतिसार हा एक महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.
उघड्यावरचे खाणे,
जल वितरणाची पद्धत, आणि घरगुती पातळीवर पाण्याची खराब हाताळणी, रस्त्यावरचे सांडपाणी, साठवण, संकलन आणि विल्हेवाट व्यवस्थापन, घरगुती पाणी साठ्याची परिस्थिती, विष्ठेची विल्हेवाट यामुळे पाच वर्षांखालील मुलांना अतिसार होण्याची शक्यता असते.
दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमधून जंतू संसर्ग शरीरात पसरतो.छोटे आणि मोठे आतडे, जठर, यकृत, ऍन नलिका या अवयवांवर प्रभाव जाणवतो.
अतिसार सुरु झाल्यावर शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. शरीराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमकुवत केली जाते. पोटात दुखणं, उलट्या होणं, अन्न पचन न होणं, अस्वस्थ वाटणं, भूक मंदावणे, झोप येणं, ग्लानी येणं, चक्कर येणं आणि सतत पातळ पाण्यासारख्या चिगट कधी कधी रक्ताळलेली शौच होणं ,ही लक्षणं दिसून येतात.
शरीराची पाण्याची पातळी घटली की मूल गळून जातं, निस्तेज होतं, डोळे खोल जातात, त्वचा सुरकूतते, ओठ तोंड कोरडं पडतं,हालचाली मंदावतात, जलसंजीवनी म्हणजे ORS (oral rehydration solution) देणं, हलका आहार देणं,
पाणी गाळून, उकळून देणं, हात स्वच्छ धुणे, अन्न झाकून ठेवणं, मलमूत्राची सुरक्षित विल्हेवाट लावणं, विशेष स्तनपान घेणाऱ्या बाळाला वारंवार अंगावरचे दूध पाजत राहणं आणि निगडित असलेल्या सर्व लसीकरणाला पूर्ण करणे या सर्व गोष्टींची दखल घेऊन काळजी घेतली तर मुलं झटपट बरी होतात आणि वारंवारिता कमी होते!
तेव्हा काळजी घेऊ या!
डॉ अभिनय दरवडे
संगोपन बालरुग्णालय, धुळे