रुपेरी पडद्यावर काळजाचा
थरकाप उडवणारे ” प्राण”
(यशवंत हरणे, धुळे)
करारी नजर आणि आवाजातला भारदस्तपणा यामुळे गेली सात दशकाहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर चरित्र अभिनेत्याची भूमिका करणारे प्राण उर्फ प्राणनाथ क्रिशन सिकंद यांचा आज स्मृती दिवस. भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या दुःखाची धग प्रत्यक्ष अनुभवणारे प्राण यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या सर्वच अभिनेत्यांबरोबर काम करुन आपली विशेष ओळख तयार केली.
प्राणनाथ किशननाथ सिकंद यांचे वडील तसे व्यवसायाने ठेकेदार होते. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागत होते. प्राण यांचा जन्म दिल्ली येथे 12 फेब्रुवारी 1920 मध्ये झाला. त्यावेळी रामपुरी चाकू साठी प्रसिद्ध असणारे रामपूर या गावांमधून प्राण यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी दिल्लीमधील दास फोटोग्राफी या ठिकाणी नोकरी केली. त्याच्याच कामानिमित्त ते लाहोरला गेले होते. लाहोर येथे प्रसिद्ध पटकथा लेखक मोहम्मद वली यांना प्राण यांची सिगारेट ओढत असताना बोलण्याची लकब चांगलीच भावली.वली हे त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे पती, आणि दलसुख पंचोली या चित्रपट निर्मात्याचे पटकथा लेखक होते. वली यांनी प्राण यांची पंचोली यांच्या समवेत भेट करून दिली . पंजाबी चित्रपट “जट यमला” यात काम करण्याची संधी मिळाली. लाहोर चित्रपट इंडस्ट्री मध्ये 1940 ते 1947 दरम्यान प्राण यांनी सुमारे 22 चित्रपटात काम केले. या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेत्यांची भूमिका करून आपली स्वतंत्र ओळख मिळवली .मात्र त्यानंतरचा त्यांचा काळ खडतर गेला. फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात दंगलीची स्थिती निर्माण झाली. त्याचा प्रत्यक्ष फटका प्राण यांना देखील सहन करावा लागला. दंगलीच्या स्थितीमुळे प्राण यांनी त्यांची पत्नी आणि एक वर्ष वयाचा मुलगा यांना मध्य प्रदेशातील इंदोर येथे नातेवाईकाकडे पाठवले. यानंतर ते देखील 11 ऑगस्ट 1947 रोजी इंदोर येथे मुलाच्या वाढदिवसाला आले. वाढदिवस साजरा झाला. पण याच वेळेस त्यांना रेडिओवरून लाहोर मध्ये सुरू असलेल्या दंगली आणि खून याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी पुन्हा लाहोर मध्ये जाण्याचा विचार सोडून दिला. लाहोर मध्ये आपण चरित्र अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालो होतो. त्याचीच संधी आपल्याला मुंबईमध्ये मिळू शकते. असा विश्वास त्यांना होता . हाच विश्वास मनात घेऊन ते परिवारासह मुंबई येथे आले.एका हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते. यावेळी दिग्दर्शकांच्या भेटी देखील त्यांनी घेतल्या. मात्र अपेक्षित काम त्यांना मिळू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचा हा काळ मोठा खडतर असा गेला. त्यांच्याजवळ असलेला पैसा देखील संपला. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी इतर ठिकाणी काम देखील करावे लागले. हा संघर्ष सुरू असतानाच त्यांना त्या काळच्या आघाडीचा अभिनेता देव आनंद यांच्याबरोबर “जिद्दी” चित्रपटात काम मिळाले .या संधीचे प्राण यांनी सोने केले. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. प्राण यांनी अभिनेता दिलीपकुमार, राज कपूर, अमिताभ बच्चन, मनोजकुमार, देवआनंद ,राजेंद्र कुमार,राजेश खन्ना, बलराज साहनी यांच्यासारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसमोर काम केले. दिग्गज अभिनेत्यांसमोर चरित्र अभिनेता उभा करीत असताना प्राण हे त्यांची भूमिका समजून घेत होते. ही भूमिका समजून घेत असताना त्यांची चालणे बोलणे याची पद्धत देखील ते विशिष्ट प्रकारे मेहनत करून पडद्यावर साकारत होते. त्यामुळेच सात दशकांपासून प्राण यांनी उभा केलेला चरित्र अभिनेता त्यावेळी पडद्यावरील नायक आणि नायिका यांचा थरकाप उडवून जात होता. तर चित्रपटगृहातील प्रेक्षकांमधून त्यांना खऱ्या अर्थाने विलन समजले जात होते. याच्या अनेक उदाहरणे त्यांनी प्रत्यक्ष जीवनात देखील अनुभवले आहेत. राज कपूर यांच्या समवेत ” जिस देश मे गंगा बहती है ” या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत सुरू असताना त्यांना त्यांच्या एका मित्राने घरी जेवण करण्यासाठी बोलावले. यावेळी प्राण त्यांच्या मित्राच्या घरी पोहोचले .मात्र प्राण यांना पाहून मित्राची बहीण खोलीत दडून बसली .आपल्या घरात डाकू आला आहे . असा समज तिने करून घेतला. प्राण गेल्यानंतर तिने ही भीती आपल्या भावाला सांगितली. यानंतर प्राण यांच्या मित्राने हा प्रसंग त्यांना सांगितला. मात्र यातून चरित्र अभिनेता प्रेक्षकांपुढे मांडण्यात प्राण यशस्वी झाल्याचे दिसते.
प्राण यांनी “जिस देश मे गंगा बहती है “या चित्रपटात राका डाकू ची भूमिका अत्यंत प्रभावशालीपणे उभी केली. राज कपूर यांच्या समवेत प्राण यांच्या असलेल्या गाण्यामधून त्यांचा करारीपणा देखील दाखवला. मन्ना डे यांच्या आवाजात ” है आग हमारे सीने मे, हम आग से खेलते आते है ” या गाण्यात प्राण यांनी अजरामर अभिनय केला. जो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्यात राज कपूर आणि प्राण यांची जुगलबंदी गायक मुकेश आणि मन्ना डे यांनी त्यांच्या सुरात मांडली .त्यावेळी प्रेक्षकांना ही जुगलबंदी चांगलीच भावली. याच चित्रपटात डाकू हा देखील चांगले जीवन जगू शकतो, हा संदेश राजकपूर यांनी दिला होता .यासाठी मुकेश यांच्या आवाजात “आ अब लौट चले ” हे गाणे चित्रित करण्यात आले. या गाण्यांमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी जाणारा राका डाकू आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारी घालमेल हा जिवंत अभिनय साकारण्यात प्राण यांनी यश मिळवले.
दिलीप कुमार यांच्या समवेत देखील प्राण यांचे असेच ट्युनिंग जुळलेले होते. अभिनय करत असताना दिलीप कुमार अभिनेता तर प्राण हे चरित्र अभिनेता होते. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात त्यांना संवाद फेक आणि अभिनय करावा लागत होता. मात्र शूटिंग संपल्यानंतर दोन्हीही एकमेकासमवेत मित्रा प्रमाणे वागत असत.यातील ” राम और शाम ” या चित्रपटात दिलीप कुमार यांचा डबल रोल होता . सुरुवातीला राम याला हातातल्या छडीने बेदम चोप देणारे प्राण नंतर शाम यांच्या हाताने मार खातात. हा जिवंत अभिनय पाहून प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत होते. यावेळी “कसा बदला घेतला” अशी प्रेक्षकांची भूमिका म्हणजे प्राण यांचा खऱ्या अर्थाने पुरस्कारच होता.
अभिनेता प्राण यांनी मनोज कुमार यांच्या समवेत देखील अजरामर भूमिका केल्या आहेत. उपकार या चित्रपटात त्यांनी साकारलेली मलंग बाबाची भूमिका आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. या चित्रपटाच्या पूर्वी प्राण यांना खाजगी जीवनात देखील ते विलनच असल्याची वागणूक चित्रपट रसिकांकडून मिळत होती .त्यांना पाहिल्यानंतर लफंगा आणि बदमाश अशीच वाक्य वापरली जात होती. मात्र उपकार या चित्रपटाच्या नंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चित्रपट रसिकांचा कमालीचा बदलला. या चित्रपटातील ” कसमे वादे प्यार वफा सब बाते है ,बातो का क्या ” हे गाणे आणि त्यावर प्राण यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन जातात. उपकार या चित्रपटाच्या यशानंतर प्राण हे एका मित्राकडे लग्न समारंभाला गेले. गर्दी असल्यामुळे त्यांनी कार लांब लावली. व पायी चालत मंडपाकडे आले .यावेळी मलंग बाबा आले, अशी प्रेक्षकांमधून प्रतिक्रिया आल्या .व प्राण यांना सन्मानाने मोकळी जागा करून देण्यात आली. या प्रसंगामुळे प्राण हे चांगलेच भारावले होते. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एके दिवशी प्राण हे शूटिंगला आल्यापासून गुपचूप बसलेले होते. मनोजकुमार यांना प्राण हे अभिनयाचा विचार करत असावे, असे वाटले. दिवसभर प्राण हे कुणाशीही बोलले नाही. अखेर शूटिंग संपल्यानंतर मनोज कुमार यांनी प्राण यांना कारण विचारले .यावेळी प्राण यांनी सांगितले की, आदल्या दिवशी सायंकाळी कलकत्ता येथे त्यांच्या बहिणीचे निधन झाले, अशी माहिती मिळाली. यावर मनोज कुमार यांनी तुम्ही अंत्यविधीसाठी जायला हवे होते, असे सांगितले. यावर प्राण यांनी सांगितले की, उपकार चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागला आहे. मी गेलो असतो तर शूटिंग रद्द करावे लागले असते .तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागले असते. त्यामुळेच मी शूटिंगला प्राधान्य दिले ,असे सांगताच मनोजकुमार देखील कमालीचे भारवले. या उदाहरणांमधून प्राण हे संवेदनशील होते .ते आपले मित्र प्रोड्युसर आणि निर्माते यांचे हित जोपासणारे होते ,ही बाब अधोरेखित होते.
अमिताभ बच्चन यांच्या समवेत डॉन चित्रपटात प्राण यांनी उभा केलेला सर्कस मास्टर हा तर कौतुकास पात्र असाच आहे .आपल्या दोन्ही मुलांना बगले मध्ये घेऊन तारेवरची कसरत करीत वाचवणारा प्राण हा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. तर पोलीस अधिकारी असणारा इफ्तेखार यांच्यासमोर विशिष्ट स्टाईलने डायलॉग वापरणारा प्राण हा प्रेक्षकांना कायम स्मरणात राहील. जंजीर चित्रपटांमध्ये संकटात असणारा आपला मित्र अमिताभ बच्चन यांच्यासमोर ” यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी ” या गाण्याच्या माध्यमातून त्याला हसवण्याचा प्रयत्न करणारा जिगरी दोस्त प्राण् यांनी साकारला.
प्राण यांच्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबाबत त्यांना २००१ मधे पद्मश्री आणि २०१३ मधे दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.याशिवाय 1967, 1969, 1972 आणि 1997 मध्ये फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. तर 1961,1963 व 1973 बंगाली फिल्म जनरलिस्ट असोसिएशन पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान झाला. मुंबई येथेच 12 जुलै 2013 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.