स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा
(यशवंत हरणे ,धुळे)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आजच्या दिवशी 1910 मध्ये फ्रान्सच्या समुद्रात उडी टाकून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले. त्यांनी केलेल्या या धाडसाला 124 वर्षे पूर्ण होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्रात उडी टाकून युरोपच्या राष्ट्रांमध्ये भारतीय स्वातंत्र्याची धग पोहोचवली. या एकाच घटनेमुळे ब्रिटिश राज्य सत्तेला देखील हादरा दिला.
भारताला ब्रिटिशांच्या जो काळातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कठोर तुरुंगवास देखील पत्करला. या शृंखलेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव महत्त्वाचे ठरते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण जीवनच राष्ट्रप्रेम आणि समाज सुधारणेच्या कामाला अर्पण केले होते .त्याचा प्रत्यय त्यांच्या जीवनकार्यातील प्रत्येक घटने मधून दिसून येतो. यावर वाद प्रतिवाद होत असले तरीही सावरकरांचे कार्य ब्रिटिश राज्य सत्तेला धडकी भरवणारे होते. ही बाब दृष्टीआड करून चालणार नाही. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेल्या सावरकरांची लहानपणापासूनच राष्ट्र प्रेमाची धडपड होती.1909 च्या सुमारास बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील त्यांना ब्रिटिशांनी पदवी देण्यास नकार दिला. सावरकरांचे कार्य हे ब्रिटिश विरोधी होते असा त्यांना संशय होता त्यामुळे त्यांना ही पदवी देण्यास सरकार अनुकूल नव्हते . बॅरीस्टरची परीक्षा पास होण्यापूर्वी सावरकर हे लंडनला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी फ्री इंडिया सोसायटी या संस्थेची स्थापना केली. पुढे अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. इंग्लंड मध्येच त्यांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 1857 मध्ये स्वातंत्र्य समर घडले .पण ब्रिटिशांनी या बंडाची उपमा देऊन त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहून भारतातल्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश राज्यसभे विरुद्ध दिलेला लढा ही स्वातंत्र्यसमरच असल्याचे सिद्ध केले. या साहित्याला ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रकाशित करण्यासाठी बंधने लादली. त्यामुळे हे पुस्तक विदेशातून प्रकाशित झाले. सावरकरांच्या या साहित्याच्या माध्यमातून उदयोन्मुख असलेल्या अनेक क्रांतिकारकांना दिशा मिळाली. त्यांचे हे सर्व साहित्य भारतात गुप्त रूपाने पाठवण्यात आले. यातूनच विदेशी बनावटीचे पिस्तुले देखील भारतात पाठविण्यात आल्याचा ब्रिटिशांना संशय होता. अशाच एका पिस्तुलातून नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये 21 डिसेंबर 1909 रोजी तत्कालीन कलेक्टर असणाऱ्या जॅक्सनवर अनंत कान्हेरे यांनी गोळीबार करून त्याला ठार केले. नाशिक येथील क्रांतिकारकांना त्रास दिल्याच्या रागातून अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा काटा काढला होता. तर विदेशी भूमीवर मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने एक जुलै 1909 रोजी कर्झन वायलीला गोळ्या घालून ठार केले. या घटनांमध्ये सावरकरांचा हात असल्याचा संशय ब्रिटिशांना होता. यातूनच त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्याचे कटकारस्थान सुरू झाले. याची कुण कुण सावरकर आणि त्यांच्या विदेशातील सहकाऱ्यांना होती. त्यामुळेच सावरकर लंडनला परत येत असतानाच त्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली ब्रिटिशांनी ताब्यात घेतले. हा खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात जहाजाने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना एक जुलै 1910 रोजी मोरया नावाच्या बोटीत बसवण्यात आले. सावरकर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन अधिकारी आणि अनेक सैनिकांची फौज तैनात करण्यात आली होती. ही बोट फ्रान्सच्या मार्शलिस बंदरावर तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आली. याच वेळी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटून फ्रान्सच्या भूमीत परत जावे, आणि तेथून ब्रिटिश राज्य सत्तेला पुन्हा आव्हान देण्याची योजना सावरकरांनी आखली. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार फ्रान्सच्या भूमीवर पोहोचल्यानंतर ब्रिटिशांना आपल्याला ताब्यात घेणे शक्य होणार नाही, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे याच ठिकाणी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणे शक्य आहे. हे ओळखून त्यांनी जहाजावरील पोर्ट होलची पाहणी केली. पण आपल्या शरीर यष्टीच्या तुलनेत होल लहान असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तरीही देशभक्तीच्या प्रेरणेने प्रेरित झालेले असल्यामुळे त्यांनी येथूनच निसटण्याचा डाव आखला. ८ जुलै, १९१० रोजी सकाळी त्यांनी त्यांच्यावर पहारा करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला शौचास जायचे असल्याचे सांगितले. यानंतर ते दोन सैनिकांच्या सोबत शौचालयात गेले. शौचकूपात जावून तिथल्या दरवाज्याला असलेल्या काचेवर स्वतःचा अंगरखा ठेवला. त्यामुळे बाहेर उभ्या पहारेकर्यांना आतल्या हालचाली दिसणार नाहीत. याची काळजी त्यांनी घेतली. यानंतर शरीराला जखमा होतील याची कोणतीही तमा न बाळगता त्यांनी सागरात उडी मारली. बराच वेळ सावरकर यांची कोणतीही चाहूल लागत नसल्याने शेवटची कुपाच्या बाहेर असलेल्या सैनिकांनी दार ठोठावले. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी काच फोडून आत पाहिले असता सावरकर निसटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही माहिती सैनिकांनी बोटीवर असणाऱ्या अधिकाऱ्याला दिल्याने अधिकारी आणि बंदोबस्ताचे पथकाने सावरकरांच्या पाठलाग करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी गोळीबारही केला.मात्र सावरकर हे फ्रान्सच्या भूमीवर पोहोचले. यावेळी गस्तीवर असणाऱ्या फ्रान्सच्या सैनिकांजवळ जाऊन त्यांनी इंग्रजी भाषेत त्यांना त्यांची बाजू सांगण्यास सुरुवात केली. त्यांना ब्रिटिशांनी ताब्यात घेतले असून आता ते फ्रान्सच्या भूमीवर असल्याने ब्रिटिश त्यांना अटक करू शकत नाही. ही आंतरराष्ट्रीय कायद्याची बाजू देखील त्यांनी या सैनिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्या फ्रेंच सैनिकांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे सावरकरांची भूमिका त्यांना समजू शकली नाही. दरम्यान ब्रिटिश अधिकारी आणि सैनिक देखील तेथे पोहोचले. त्यांनी या सैनिकांना लाच देऊन सावरकरांना पुन्हा ताब्यात घेऊन बळजबरीने बोटीवर आणले. यानंतर त्यांचा पुन्हा भारत प्रवास सुरू झाला. भारतात आल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. सशस्त्र बंड करणाऱ्या क्रांतिकारकांना शस्त्र पुरवल्याचा आणि अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. याच आरोपातून त्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली .
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समुद्रात उडी टाकून फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवून युरोपीय देशांमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्याची धग पोहोचवण्याचे काम केले. विशेष म्हणजे हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात देखील पोहोचला. पण फ्रान्सच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताला पर्यायाने सावरकरांना त्याचा उपयोग होऊ शकला नाही. मात्र या घटनेमुळे फ्रान्सच्या राज्य सत्तेला देखील किंमत चुकवावी लागली. फ्रान्सच्या तत्कालीन पंतप्रधानाला पायउतार व्हावे लागले. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर अटक केल्याच्या घटनेचे वृत्त युरोपीय राष्ट्रातील वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केले. यात ब्रिटिशांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे देखील ओढण्यात आले. त्यामुळे सावरकरांनी फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवण्याच्या घटनेमुळे एक प्रकारे ब्रिटिशांची जगभरात नाचक्की झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांची चुकीची भूमिका देखील जगभरात पोहोचली. ब्रिटिश राज्य सत्तेने दमनशाहीचा वापर करून आंतरराष्ट्रीय न्यायालय तसेच फ्रान्स मधली घटना त्यांच्या पद्धतीने हाताळली. त्यात त्यांना यश आले असले तरीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समुद्रात टाकलेली उडी ही ब्रिटिश राज्य सत्तेच्या पाया खिळखिळा करून गेली.
आज या घटनेला 124 वर्ष होत आहे. देश प्रेमाने प्रेरित झालेल्या सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारकाने अनोळखी असणाऱ्या समुद्राच्या अथांग पाण्यात उडी मारावी. आणि पोहत किनारा गाठावा, हे धाडस सर्वसामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे.