*संवाद फेकीचा बादशहा राजकुमार*
(यशवंत हरणे,धुळे)
चीनॉय शेठ, जिनके अपने शीशे के घर होते है, वो औरो पर पत्थर फेका नही करते ! अशा आठवणीतील संवाद फेकी मधून चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजकुमार यांचा आज 3 जुलै रोजी स्मृती दिवस आपल्या लहरी स्वभाव आणि राजबिंड वागण्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.
राजकुमार यांचा जन्म 8 ऑक्टोंबर 1926 मध्ये बलुचिस्तान या प्रांतात झाला. त्यांचे मूळ नाव कुलभूषण हे होते. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते पोलीस दलात सहभागी झाले. मुंबई येथील माहीम पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक देखील झाली. याच पोलीस स्टेशन मधून त्यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरू झाला. या पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी राजकुमार यांचे बोलणे, चालणे आणि व्यक्तिमत्व पाहून त्यांना आपण चित्रपटातील हिरो सारखे शोभतात, असे सांगितले. त्यामुळे राजकुमार यांनी चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमावण्याचे निश्चित केले. त्यावेळी माहीम पोलीस ठाण्यामध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक आणि निर्माते यांचे कामानिमित्त येणे होते. याच दरम्यान निर्माते बलदेव दुबे हे माहीम पोलीस ठाण्यात आले. त्यांची भेट राजकुमार तथा कुलभूषण यांच्याशी झाली. यावेळी कुलभूषण यांचे बोलणे आणि वागणे पाहून त्यांनी थेट त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. पोलीस अधिकारी कुलभूषण यांनी देखील ही ऑफर स्वीकारून शाही बाजार चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली. आणि येथूनच कुलभूषणचा राजकुमार यांच्या रूपाने चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू झाला. शाही बाजार या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही यानंतर राजकुमार यांनी रंगीली चित्रपटात भूमिका केली मात्र हा चित्रपट देखील राजकुमार यांना फारसी प्रसिद्धी देऊ शकला नाही. परिणामी राजकुमार यांच्या संबंधितांनी त्यांना चित्रपटसृष्टी पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र राजकुमार यांनी 1952 ते 1957 या काळात आपला संघर्ष सुरूच ठेवला.या कालावधीमध्ये त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून नशीब आजमावले. पण यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करू शकला नाही. अखेर 1957 मध्ये महबूब यांनी तयार केलेल्या मदर इंडिया या चित्रपटांमध्ये राजकुमार रुपेरी परद्यावर झळकले. हा चित्रपट तसा नायिका प्रधान असला तरीही राजकुमार यांनी शेतकऱ्याची भूमिका करीत असतांना आपल्या अभिनयाची छाप या चित्रपटावर सोडली. येथूनच त्यांचा चित्रपट सृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. यानंतर 1959 या वर्षात राजकुमार यांना पैगाम नावाचा आणखी एक यशस्वी चित्रपट मिळाला. या चित्रपटात त्यावेळी फॉर्मात असणारे दिलीप कुमार यांच्या समवेत राजकुमार यांनी काम केले. या चित्रपटात देखील राजकुमार यांनी दिलीप कुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाल केली.त्यानंतर लगेचच दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या माध्यमातून राजकुमार यांनी बॉक्स ऑफिसवर आपली पकड बसवली. या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी केलेला अभिनय हा सिने रसिकांच्या मनावर आज देखील जादू करतो.
1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या काजल या चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता म्हणून आपल्या अभिनयाचा वेगळा पैलू दाखविण्यात यशस्वी ठरले. याचवर्षी आलेल्या बी.आर.चोपडांच्या वक्त या चित्रपटात आपल्या संवादफेकीने राजकुमार लक्षात राहिले. त्यांचा याच चित्रपटातील ‘चिनायसेठ जिनके घर शीशेके होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते’ तसेच ‘ ये बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है ’ हे संवाद चांगलेच लोकप्रिय झाले . या चित्रपटातील संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली. या चित्रपटानंतर राजकुमार चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च स्थानी पोहचले. या ठिकाणी पोहचल्यानंतर बहुतेक अभिनेते एका ठराविक इमेजमध्ये बांधले जातात. त्याच त्या भूमिका स्वीकारतात. मात्र राजकुमार याला अपवाद होते. यानंतर आलेल्या हमराज (1967), नीलकमल (1968), मेरे हुजूर (1968), हीररांझा (1970), पाकीजा (1971) या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या इमेजला साजेशा नसलेल्या भूमिका केल्या. तरीही या प्रयोगात राजकुमार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पाकिजा हा चित्रपट पूर्णतः मीनाकुमारी यांच्यावर केंद्रित असलेला चित्रपट होता. पण आपल्या सशक्त अभिनय आणि संवादफेकीने राजकुमार इथेही सरस ठरले. पाकीजा चित्रपटांमध्ये अभिनेत्री मीनाकुमारी यांना राजकुमार यांनी‘आपके पांव देखे बहुत हसीन हैं, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे’ हा संवाद तसेच मेरे हुजूर चित्रपटातील ” लखनऊ की ऐसी कौन सी फिरदोस है , जिसे हम नही जानते ” या प्रकारचा संवाद लोकप्रिय झाला.
1978 मध्ये आलेल्या कर्मयोगी चित्रपटातून राजकुमार यांच्या अभिनयातील विविधतेचा एक वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यात त्यांनी केलेल्या दुहेरी भूमिकांमधून त्यांनी चरित्र भूमिकांकडे जाणारा आपला अभिनयाचा प्रवास विविधतेने नटलेल्या अनोख्या भूमिकांकडे वळवला. तरीही 1980 मध्ये बुलंदी चित्रपटात चरित्र भूमिका करण्याचे धाडस त्यांनी केलेच. यानंतर कुदरत (1981), धर्मकांटा (1982), शरारा (1984), राजतिलक (1984), एक नयी पहेली (1984), मरते दम तक (1987,), सूर्या (1989), जंगबाज (1989), पुलिस पब्लिक (1990) या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातून राजकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील राज्य अधिक विस्तारीत केले. या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी अभिनेत्याला ” जानी ” म्हणून डिवचने प्रेक्षकांना चांगलेच भावले.
यानंतर1991 मध्ये आलेला सौदागर या चित्रपटात राजकुमार यांच्या अभिनयाचा वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. शो मॅन सुभाष घई यांनी 1959 च्या पैगाम चित्रपटानंतर प्रथमच दिलीपकुमार व राजकुमार हे दोन्ही महारथी कलाकारांना एकमेकांसमोर उभे करण्यात यश मिळवले. पैगाम या चित्रपटात कसलेले अभिनेते दिलीप कुमार यांच्यासमोर अभिनयाच्या माध्यमातून राजकुमार यांनी मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे आपली इमेज जपण्यासाठी हे दोन्हीही अभिनेते यानंतर कोणत्याही चित्रपटात एकत्र आले नाही. किंबहुना चित्रपट निर्मात्यांना या दोघांना एकत्र आणण्यात यश आले नाही. पण सुभाष घई यांनी मात्र ही किमया सौदागर चित्रपटाच्या माध्यमातून करून दाखवली. ती कमालीची यशस्वी देखील झाली. या चित्रपटात राजकुमार हे चित्रपटात त्यांचे विरोधक असणाऱ्या दिलीप कुमार यांच्या प्रभाव असणाऱ्या भागात उतरतात. समोर विरोधकांचा मोठा जमाव असताना देखील राजकुमार आपल्या शैलीमध्ये संवाद फेकी द्वारे घायाळ करतात. या चित्रपटातील त्यांचा “साप और बिच्छू हमारे पास से रेंग कर निकल जाते है” तसेच अभिनेता अमरीश पुरी यांना” हम शिकार पर शेर को भेजते है ,लोमडीयो को नही ” हा संवाद देखील प्रेक्षकांना आजही स्मरणात आहे. या चित्रपटात दिलीप कुमार यांच्याबरोबर राजकुमार यांनी “इमली का बुटा, बेरी का पेड ” या गाण्यावर मारलेले ठुमके तसेच तिरंगा या चित्रपटात नाना पाटेकर यांच्याबरोबर “पिले पिले ओ मेरी जानी” या गाण्यावरील त्यांची अदा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. 90च्या दशकात राजकुमार यांनी चित्रपटातून काम करणे कमी केले. तरीही तिरंगा (1992), पुलिस और मुजरिम, इंसानियत के देवता (1993), बेताज बादशहा (1994), जवाब (1995), गॉड और गन हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले.
यानंतरच्या कालावधीत मात्र राजकुमार हे एकांत वासात राहणे पसंत करीत होते. एका असाध्य आजाराने ते पीडित होते मात्र त्यांचे दुःख त्यांनी कधीही बाहेर येऊ दिले नाही. त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूलच लागली होती. त्यामुळे त्यांनी मुलगा पुरु राजकुमार याला मृत्यू नंतर त्यांचा जिवलग मित्र चेतन आनंद याच्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती देऊ नये अशी इच्छा व्यक्त केली. येथेही त्यांनी आपला करारी बाणा जपला. जिंदगी और मौत निजी मामला होता है. इसलिये यह बात केवल चेतन आनंद की अलावा किसी को नही बताना .मेरे अंतिम संस्कार के बाद ही बॉलीवुड के लोगो को यह बात बताना.अशा शब्दात त्यांनी पुरू राजकुमार यांना सांगितले. अखेर 3 जुलै 1996 ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या अंतिम संस्कारानंतर सर्व चित्रपट रसिकांना मिळाली. यावेळी प्रत्येकाला त्यांच्या मृत्यूचा धक्का बसला. पण आजही आपल्या प्रतिस्पर्धी अभिनेत्याला “जानी” म्हणून डिवचणारे राजकुमार, “जिनके अपने शिशों के घर होते है ,वो और उपर पत्थर नही फेकते” असे म्हणणारा करारी अभिनेता. ” हम कुत्तो से बात नही करते” असे म्हणून प्रतिस्पर्ध्याला त्याची जागा दाखवणारा अभिनेता. हा कायम प्रत्येकाच्या हृदयात घर करून आहे.